सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस इतका यांत्रिक झालाय की आजूबाजूचा निसर्ग, त्याचे सौंदर्य बघणंच विसरून गेलाय. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, आपल्या आवडीनिवडी जपाव्यात हेदेखील तो विसरून चाललाय. त्यामुळे प्रत्येकाचा जणू यंत्रमानव झालाय.यातून बाहेर पडून स्वतःसाठी जगायची गरज आहे...
.......
आपण बरेच वेळा स्वत:साठी जगायचं विसरून जातो. मला सांगा, दिवसातून राहू दया, महिन्यातून किती वेळा तुम्ही घराच्या बाल्कनीत निवांत उभे रहाता. किती वेळा समोरचे झाड़ पहाता. त्याच्या पानांच्या सळसळीकडे लक्षपूर्वक पहाता. तुम्ही नीट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याश्या नवीन पक्षाने तिथे नवीन घरटे बांधले आहे आणि त्या दोघांची लगबग ही नवीन लग्न होऊन घरात सत्यनारायण घेतलेल्या जोडप्यापेक्षा अजिबात कमी नाही. घरट्याचं काम साधंच, पण किती नीटनेटकं. आणि अभिमान स्वत्:च्या ओनरशिपच्या जागेत राहिल्यासारखा लिव्ह अँड लायन्सेसचे येथे काम नाही.
तुमच्या कधी लक्षात आलंय का, की एक चिमणीच्या आकारापेक्षा लहान पक्षी जवळपास त्याच्याच आकाराच्या फुलात शिरला आहे आणि मनसोक्त रसपान करतो आहे. एरवी तुम्हाला तो दिसलाही नसता, पण त्याची ती बारीक टोकदार शेपटी थोडीशी बाहेर आलेली आहे आणि त्यामुळेच तो तुम्हाला तो दिसतो आहे. मनसोक्त रसपान केल्यावर तो चटकन उडून जातो. त्याचे आणि त्या फुलाचे समाधान तुम्हाला जाणवते आहे. अगदी आईने बाळाला दूध पाजल्यावर आई आणि बाळाला जे समाधान मिळते अगदी तसेच हे समाधान आहे.
झाडाच्या वरच्या भागात एक ढोली आहे आणि ते अनेक राव्यांचे वस्तीस्थान आहे. साधारण संध्याकाळी साडे चारच्या सुमारास त्यांची लगबग सुरू होते. दूर गेलेल्या इतर राव्यांना परत येण्यासाठी त्यांचे आवाहन चालू होते आणि थोड्याच वेळात ते ढोलीच्या आसपासचे खोड हिरवे गार होऊन जाते; जणू झाडाला नवीन कोंब आला आहे.
तुम्ही नवीन घरासाठी नवीन फर्निचरचे नियोजन करत असता आणि नेमके त्याच वेळी तुमच्या घराच्या पोट माळ्यावर खारीने तुमची एनओसी न घेता एक सुंदरसं; पण मजबूत घरट बांधलेलं असतं. लोन वगैरे काही नाही सगळ बांधकाम रोखीचं बरं का. ना कर्जाचा हप्ता, ना देखभाल खर्च, एवढंच काय तर यूटिलिटी बिल्सदेखील नाहीत. बरं, काम इतके मजबूत की, स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा करायची गरज नाही.
तुमच्या कधी लक्षात आले का, की हे सगळे पक्षी संध्याकाळी सहानंतर घरटयात परततात आणि संध्याकाळी सहानंतर सकाळी सहापर्यंत काही खात नाहीत. हेच आपल्याला आयुर्वेदात सांगितलं आहे. सायंकाळी सहा वाजता जेवावे; पण आपण ऑफीसमध्ये त्याचवेळी संध्याकाळचा नाश्ता ऑर्डर करतो. रात्री दहा वाजता घरी येतो आणि मग जेवतो.
निसर्गात राहून आपण निसर्गाबाहेरच उरतो. एक दिवस ठरवून संध्याकाळी घराच्या बाल्कनीत निवांत उभे राहून पाहा, जरा एक दिवस निदान काही वेळ तरी स्वत:साठी काढून बघा. आज नाही जमलं तरी उद्या नक्की.
- केदार साखरदांडे, मुंबई